16/07/2026
साधारणपणे पंचाहत्तरी ओलांडलेली, कमरेतून थोडी वाकलेली म्हातारी गोंधळून इकडे तिकडे पाहत होती. हातामध्ये केसपेपर होता, कुठं जायचं कळत नसावं. गर्दी भरपूर होती, तेवढ्या गर्दीतून आजीनं पेपर कसा काढला असेल हाच प्रश्न पडला होता.
"आजी काय झालंय?"
त्यांना फारसं ऐकू येत नसावं. तीनचार वेळेस विचारल्यावर म्हातारी म्हणाली, "काही नाही बाबा."
"काही नाही तर मग दवाखान्यात का आलात आणि सोबत कोण आहे?"
फिकट झालेलं नऊवारी लुगडं, पदर डोक्यावर, पदराआडून बाहेर डोकावत असलेले चंदेरी केस. कपाळावर कुंकू नव्हतं, गळ्यातील काळ्या मण्याची पोत सुरकुतलेल्या गळ्याला चिटकून बसली होती. जुन्या शेवाळलेल्या विहिरीच्या खोल काळ्याभोर पाण्यासारखे तिचे डोळे कोणालातरी शोधत होते.
म्हातारी गोंधळलेली दिसत होती, काय बोलावं त्यांना कळत नसावं. आज्जीला बसायला सांगितलं. एका नर्सनं तिला आपुलकीनं काही प्रश्न विचारले. सगळ्यांचं शांत बोलणं ऐकून आजी म्हणाली,
"माझा मुलगा घेऊन आलाय मला."
"गाव कोणतं?"
एकतर आजीला बोललेलं लवकर कळत नव्हतं. एकच गोष्ट तीनदा विचारावी लागत होती.
"असं सांगा ना आजी, काय झालं तुम्हाला आणि मुलगा कुठं आहे?"
काही क्षण थांबून म्हातारी म्हणाली,
"पलीकडं काहीतरी खायला आणतो म्हणून गेलाय." आजी बाहेरच्या दिशेला हात करत म्हणाली.
"ठीक आहे, तुम्हाला काय होतंय?" आज्जीच्या हातातला पेपर हाती घेत विचारलं.
"काहीच नाही." म्हातारीचं पुन्हा तेच उत्तर.
"मग मुलगा तुम्हाला कशासाठी घेऊन आलाय?"
म्हातारी थोडा वेळ शांत राहिली आणि काही स्पष्ट काही अस्पष्ट शब्दात बोलू लागली,
"आमी पंढरपूरला आलोय दर्शन घ्यायला. मला माझा मुलगा म्हणला, तुला दवाखान्यात दाखवू, सलाईन लावून मग मंदिरात जाऊ तर हित्ं नुसती गर्दी...
"सलाईन का लावायचं होतं आजी? आम्ही तेच तर विचारतोय, काय त्रास होतोय?" नर्सनं विचारलं
"इठ्ठला शपथ सांगते, मला कायीच झालं नाही. तुम्ही काय म्हणताय मला कळत नाही, माझ्या मुलाला बोलवा. तो म्हणला चल दवाखान्यात म्हणून आले."
"किती वेळ झाला आजी त्याला जाऊन?"
"लई वेळ झाला... तासभर होऊन गेला असंल."
आजीला विचारलं काही मोबाईल नंबर वगैरे आहे का मुलाचा. आजीजवळ दहा दहाच्या काही नोटा सोडल्या तर काहीच नव्हतं, काही चिठ्ठी नव्हती, कागद नव्हता. गावाचं नाव विचारलं तर त्यांना काही कळत नव्हतं.
सगळा प्रकार लक्षात येऊ लागला होता... आजीला कसं सांगावं हा प्रश्न पडला होता, म्हातारी पोराची वाट बघत बसली होती.
तसेच कसेतरी शब्द जुळवून सांगावं लागलं,
"आज्जी... हे गाव पंढरपूर नाही... खूप दूर आहे तिथून. तुझा मुलगा तुला इथं सोडून गेला आज्जे!"
तिला कळलं की नाही माहीत नाही... म्हातारी निर्विकारपणे बघत राहिली. खोल गेलेल्या डोळ्यांनी ती अजूनही तशीच येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाकडे ती पाहत होती. पुढचे जवळपास तीन तास तशीच बसून होती. या मधल्या काळात पोलिसांना सांगितलं... आजीच्या मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण तो काही सापडला नाही.
आपल्या देशात अशा मोठ्या सरकारी दवाखान्यात असंख्य म्हाताऱ्यांना बेवारस सोडलं जात. घरी सांभाळणं होत नाही, त्यांची अडचण वाटते, एखाद्याला दुर्धर आजार असतो, सासु सुनेचा वाद असतो... खरंतर त्यांचा उपयोग संपलेला असतो !
वृद्धाश्रमात ठेवलं तर लोक नावं ठेवतात. गर्दीच्या ठिकाणी घेऊन जाऊन हात सोडून द्यायची प्रत्येकाची हिम्मत होत नाही... हो काहीजण तेही करतात ! बरं सरकारी दवाखान्यातच का? कारण इथं खायला भेटतं, इथं सतत कोणी ना कोणी अन्नदान करत राहतं. कसे का असेनात पण उपचार भेटतात, डोक्यावरती छप्पर भेटतं. नजरेआड 'आपलं माणूस' जिवंत राहण्याची खात्री वाटते. जा मायबापानं हे जग दाखवलं त्यांच्याबद्दल एवढी तर काळजी वाटलीच पाहिजे ना?
म्हातारी एका ठिकाणी बराच वेळ बसली होती. बऱ्याच वेळानं तिला कळलं असावं सगळं... बसल्या जागेवर ती काहीतरी पुटपुटत होती...
काय सुरू असेल म्हातारीच्या मनात? काय काय आठवत असेल तिला? पोटात असतानाची त्याने केलेली पहिली हालचाल. जन्मल्यावर पहिल्यांदा दोघांची झालेली नजरानजर ! प्रेमाची असंख्य आलिंगनं ! त्या इवल्याशा बाळाचं रडणं, त्याचं पडणं, खेळणं... नजरेसमोर मोठं होणं !
लहानपणी कधीतरी गर्दीत पोरगं काही क्षणासाठी नजरेआड झालं असेल तर आईचा जीव गळ्यापर्यंत आला असेल ! आज तोच मुलगा अनोळखी गर्दीत हात सोडून गेला... खोल डोळ्यातील शेवाळलेली विहीर पाझरू लागली होती...
डॉ. प्रकाश कोयाडे सर यांच्या वॉल वरून
#मराठीभाषा #स्टोरी